रिपोर्टर नूरखान
जळगाव :- जिल्ह्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका 2025 पारदर्शक, शांत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक सर्व तयारी तत्परतेने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या आढावा बैठकीत श्री घुगे बोलत होते.
या बैठकीला,जिल्हा पोलीस अधीक्षक, महेश्वर रेड्डी उपजिल्हाधिकारी, विजयकुमार ढगे,सहआयुक्त नगरपरिषद जनार्दन पवार, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच संबंधित पोलीस अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी श्री घुगे यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका 2025 बाबत कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. 4 नोव्हेंबर 2025 रोजी सायं. 4 वाजल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी 10 ते 17 नोव्हेंबर 2025 दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. अंतिम उमेदवारांची यादी 26 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. मतदान 2 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल, तर मतमोजणी व निकाल जाहीर 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होईल.
जिल्हाधिकारी,यांनी स्पष्ट केले की, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कायदा आणि सुव्यवस्थेच्या चौकटीत पार पाडली पाहिजे. याकरिता पोलीस विभागाला कायदा-सुव्यवस्थेसाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. संवेदनशील भागांमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था, गुन्हेगारांवर कारवाई, तसेच मद्य व पैशांच्या वितरणावर कठोर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. गुंडगिरी, धमकावणे, आर्थिक शक्तीचा गैरवापर तसेच मद्य, पैसा किंवा अन्य वस्तूंचे वितरण रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.
तसेच फरार, सराईत गुन्हेगार व जामीनावर किंवा पॅरोलवर सुटलेले आरोपी यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले. आचारसंहिता प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी भरारी पथक (Flying Squad), चेक पोस्टसाठी पथक (SST) व व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम (VST) या पथकांना सक्रिय ठेवण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
“एकल खिडकी प्रणाली” (Single Window System) सुरू करून निवडणुकीशी संबंधित परवानगी जलद आणि पारदर्शकपणे देण्याचे निर्देश देण्यात आले. उपविभागीय अधिकाऱ्यांना तडीपारी प्रकरणांचा निपटारा तत्काळ करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
मतदान केंद्रांवरील तयारीबाबत जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, प्रत्येक मतदान केंद्रावर वीज, पाणी, शौचालय आणि दिव्यांगांसाठी रॅम्प यांसारख्या मूलभूत सुविधा असाव्यात. या सुविधा नसलेल्या केंद्रांवर तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. मतदान व मतमोजणी अधिकारी तसेच कर्मचार्यांचे दोन सत्रांमध्ये प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल. प्रशिक्षणात EVM हाताळणी, मॉक पोल, आणि मतमोजणी प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दिले जाणार आहे.
बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी निर्देश दिले की, सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून वेळेत सर्व तयारी पूर्ण करावी आणि निवडणूक प्रक्रिया शांत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात यशस्वीरीत्या पार पाडावी.




