रिपोर्टर नूरखान
आमदार अनिल पाटील फुंकणार स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे रणशिंग
अमळनेर : अमळनेर तालुका व शहर विकास आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुधवार, दि. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता कलागुरू मंगल कार्यालय, अमळनेर येथे भव्य बूथ कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याचे नेतृत्व माजी कॅबिनेट मंत्री व विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील करणार असून, या मेळाव्यातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागाचा संयुक्त मेळावा घेण्यात येत आहे. मेळाव्याच्या तयारीसाठी नुकत्याच झालेल्या बैठकीत शहर व ग्रामीण भागातील प्रमुख कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवडणूक तयारीबाबत आपले मत मांडले.
ग्रामिण कार्यकर्त्यांच्या बैठकीत महायुतीबाबत सकारात्मकता व्यक्त करत “आमदार अनिल पाटील जो निर्णय घेतील, तो मान्य राहील,” असा एकमताचा सूर नोंदविण्यात आला. तर शहरातील बैठकीत भाजपाबरोबर एकत्र येण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असली तरी निवडणूक शहर विकास आघाडीच्या माध्यमातूनच लढविण्याचा आग्रह माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केला.
या दोन्ही बैठकीत आमदार पाटील यांनी सांगितले की, 29 ऑक्टोबर रोजीच्या मेळाव्यानंतर नेतेमंडळींचे मार्गदर्शन घेऊन आणि महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन्ही निवडणुका जोमाने लढवून कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, जनतेच्या विश्वासावर आणि विकासाच्या बळावर अमळनेर तालुका व शहर विकास आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही पक्षांकडून मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असून, हा मेळावा आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
तरी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख आणि लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.




