रिपोर्टर नूरखान
अमळनेर : – स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय (MoHUA), भारत सरकार यांच्या आदेशानुसार ‘सेवा पंधरवडा – स्वच्छोस्तव : स्वच्छता ही सेवा’ या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी अमळनेर नगर परिषद मार्फत करण्यात येत आहे. या अभियानाचा औपचारिक प्रारंभ १८ सप्टेंबर २०२५ रोजी विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साही वातावरणात करण्यात आला.
सकाळी १० ते ४ या वेळेत ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये NULM बचत गटातील महिला, सफाई कर्मचारी, पीएम आवास योजनेचे लाभार्थी यांनी सहभाग नोंदवून वैद्यकीय तपासणीचा लाभ घेतला.
त्यानंतर सकाळी ११ वाजता ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबीर’ पार पडले. यावेळी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ व नगर परिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या हस्ते पीएम आवास योजनेंतर्गत ५ लाभार्थ्यांना प्रतीकात्मक घरकुलाच्या चाव्या देण्यात आल्या. याशिवाय ५ लाभार्थ्यांना बांधकाम परवानग्या व ३ महिला बचत गटांना १९ लाख रुपये अर्थसहाय्याचे वितरण दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत करण्यात आले.
या वेळी ‘प्रधानमंत्री सूर्य घर योजना’ बाबतही नागरिकांना माहिती देण्यात आली.
दुपारी २ वाजता धुळे रोडवरील रवी नगर आणि साने गुरुजी उड्डाण पुलाजवळ वृक्षारोपण उपक्रम पार पडला. यावेळी एकूण ७५ झाडांचे वृक्षारोपण खासदार स्मिताताई वाघ, भैरवीताई पलांडे, मुख्याधिकारी तुषार नेरकर, डॉ. अनिल शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
त्यानंतर अमळनेर बस स्थानक परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी मान्यवरांनी स्वतः झाडू हाती घेऊन परिसर स्वच्छ केला व जनतेमध्ये स्वच्छतेचा संदेश दिला.
या कार्यक्रमांसाठी उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण, अभियंता सुनील पाटील, स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे, पाणीपुरवठा अभियंता प्रवीण बैसाणे यांच्यासह नगर परिषदेतील सर्व विभागप्रमुख, १ ते १७ प्रभागांचे मुकादम, सफाई कर्मचारी, महिला सखी, सामाजिक संस्था, पत्रकार, वन विभागाचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उपक्रम नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असून, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
“अमळनेर शहर स्वच्छ, सुंदर व हरित करण्यासाठी प्रत्येक नागरिक, संस्था व शासकीय यंत्रणेचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे,” असे आवाहन खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, मुख्याधिकारी तुषार नेरकर आणि डॉ. अनिल शिंदे यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना केले.